https://images.loksatta.com/2020/02/Raj-Thackeray-4.jpg?w=830

औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? – राज ठाकरे

शिवसेनेवर साधला निशाना

by

औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी बोलताना राज ठाकरे यांना शिवसेनेनवर अप्रत्यक्षपणे टीका केली. औरंगाबादचं नामाकरण करणे हा शिवसेनेचा अजेंडा होता? तुम्हीही तोच अजेंडा घेत आहात का? त्यावर बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस औरंगाबादेत मुक्कामी आहेत. शहरातील विविध चौकात फलकांवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करावे या मागणीचा मनसेकडून जोर वाढला आहे. तसेच महापालिका निवडणुकांची तयारी करण्याच्या दृष्टीने राज ठाकरे औरंगाबाद येथे मुक्कामी येणार असल्याने शहरातील प्रमुख चौकात त्यांना ‘हिंदू जननायक’ अशी बिरुदावली लिहिली आहेत. त्यावर प्रश्न विचारला असता मला हिंदू जननायक म्हणून नका, असे ते म्हणाले. शरद पवारांशी तुमचे संबंध अजूनही चांगले आहेत का? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी मिश्किलपणे हसत माझे आणि शरद पवार यांचे अजूनही चांगले राजकीय संबंध असल्याचे सांगितले.

मनसेच्या केवळ झेंड्यात बदल झाला आहे, भूमिका कोणतीही बदलली नाही, हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांंनी कधी भूमिका घेतली का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला विचारला. तसेच नव्या झेंड्याबाबात कोणतही नोटीस आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कसा असेल राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा?

१४ फेब्रुवारी रोजी मनसेमधील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे भेटणार असून १५ फेब्रुवारीला शिक्षक संघटनेच्यावतीने होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावाही राज ठाकरे घेणार असून या दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी, गड-किल्ले संवर्धनासाठी झटणारी मंडळी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या गाठीभेटी राज ठाकरे घेणार आहेत.