https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/areyud_201911331833.jpg
Aarey Car Shed: कारशेड प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, आरेतील वृक्षांना हात लावाल तर...

Aarey Car Shed: कारशेड प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, आरेतील वृक्षांना हात लावाल तर...

मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यात आली. त्यानंतर सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये

by

मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुरूवारी शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा पार पडला. या पार्श्वभूमीवर दादरमधील शिवसेना भवनाला रोषणाई करण्यात आली आहे. यातच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना भवनासमोर नागरिकांनी पोस्टर झळकावून उद्धव ठाकरेंना एका आश्वासनाची आठवण करुन दिली होती. आरेतील वृक्षतोडीवर तात्काळ निर्णय घेतला असून झाडांची कत्तल चालणार नाही. मेट्रोच्या कारशेडचं काम सुरु राहिला. पण, आरेतील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मुंबईतील विधिमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला.  

उद्धव ठाकरेंनी परंपरेनुसार पदभार स्विकारल्यानंतर विधिमंडळ वार्ताहर संघात जाऊन पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित मुंबईत जन्मलेला,वाढलेला महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री मीच आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणखी काही वेगळं करता येईल का, याबाबत मी विचारधीन आहे. त्यासोबत महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठीही मी तेवढाच विचार करत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आता जेवढी झाडं राहिली आहेत, ती तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड पडणार नसून त्या झाडांचं पानही कुणी तोडणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीला स्थगिती दिल्याचं सांगितलं.    

मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यात आली. त्यानंतर सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. तसेच, सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल करू असे आश्वासन शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्याचीच आठवण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर नागरिकांनी करुन दिली. यावेळी 'आरे बचाव' असे पोस्टर हातात घेऊन शिवसेना भवनाबाहेर नागरिकांनी घोषणाबाजी केली होती. दरम्यान, आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह या सर्वांना शपथ दिली.